Friday 28 September 2012

पाण्याच्या बाटलीची गोष्ट

ही गोष्ट आहे आपली. माणसाच्या आणि या निसर्गाच्या नात्याची. वस्तुंच्या मोहापायी माणूस निसर्गाला विसरून गेला त्याची.
कधी विचार केला आहे, आपण वापरलेल्या गोष्टी आपण टाकून दिल्यावर त्याचं काय होतं? हो, बरोबर, त्या कचऱ्यात जाऊन पडतात. पण मग त्या कचऱ्याच काय होतं? तो कुठे जातो? कुठे साठवला जातो? या सगळ्या आणि इतर अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला ‘The story of Bottled water’ या animation film मधून मिळतात.
आज आपण कुठे घराच्या बाहेर गेलो, सिनेमा किंवा सहलीला गेलो तर आपल्याला पाणी आणि अनेक शीतपेये प्लास्टिकच्या बाटल्यांमधून उपलब्ध होतात. वागवायला सोपे म्हणून आपण अशा बाटल्या विकतही घेतो. अनेक जाहिरातींद्वारे आपल्यावर ते पाणी कसं काश्मीर किंवा अशाच कोणत्यातरी झऱ्यातून गोळा केलं गेलं आहे असं सांगण्यात येतं. पण खरी परिस्थिती ही या पेक्षा फार वेगळी आहे. आपण घरी स्वच्छ केलेलं पाणी आणि या बाटल्यांमधून मिळाणारं पाणी यामध्ये गुणात्मक फरक फारच कमी असतो. पण हे बाटलीतलं पाणी प्रदूषण तर करताच पण त्याहूनही अधिक घातक म्हणजे आपल्या भूगर्भात असलेला पाण्याचा साठाही कमी करतं. हे प्लास्टिकच्या बाटलीतलं पाणी साध्या पाण्यापेक्षा अनेक हजार पटीने महाग असतं हे वेगळंच! वर अशा बाटल्यांच्या कचऱ्याचा खच हे ‘विकसित देश’ आपल्या सारख्या विकसनशील देशात येऊन टाकतात.
या गोष्टीचा शेवट सुखद करायचा का दु:खद हे आपल्याचं हातात आहे. त्यासाठी याविषयावरची संपूर्ण माहिती असणं आवश्यक आहे.
नक्की पहा.. केवळ ८ मिनिटांचा हा लघुपट ‘The Story of Bottled Water  http://www.youtube.com/watch?v=Se12y9hSOM0

-    प्रज्ञा शिदोरे

(दि. २८ सप्टेंबरच्या दै. लोकमत मध्ये प्रसिद्ध )

No comments:

Post a Comment