Monday 31 December 2012

स्वातंत्र्यासाठी !


जर्मनीच्या गटेनबर्गने पंधराव्या शतकात छपाईतंत्राचा शोध लावला आणि जग बदलूनच गेलं. पुस्तकं स्वस्त झाली. ज्ञानाचा प्रसार झपाट्याने व्हायला लागला. याआधी लोकांपर्यंत विचार पोचवणं अतिशय कठीण काम होतं. पण आता लोक आपले विचार पुस्तकात लिहून इतरांपर्यंत पोचवू लागले.
पण वेगळ्या, मुक्त विचारांवर बंदी घालण्याचं काम जगाच्या सगळ्या भागातील सत्ताधारी, हितसंबंधी, धार्मिक गटांनी केलं. पुस्तकांमार्फत वेगळे विचार पसरले तर आपले अधिकार-सत्ता धोक्यात येईल अशी भीती वाटल्याने जगभर असंख्य पुस्तकांवर बंदी घालण्यात आली. भारतातही स्वा.सावरकरांच्या पुस्तकांवर ब्रिटिशांनी बंदी घातली होती!
माणसाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कोणत्याही परिस्थितीत बंधन येता कामा नये, या विचाराने इंग्लंडमधील काही संस्था आणि ग्रंथालये एकत्र आली आणि त्यांनी सुरु केली एक वेबसाईट! यावर त्यांनी जगातील वेगवेगळ्या देशात बंदी घातलेल्या प्रसिद्ध पुस्तकांची यादी दिली आहे. यामध्ये शेक्सपिअर पासून ते जॉर्ज ऑरवेल, वॉल्तेअर, कार्ल मार्क्स, सलमान रश्दी यांच्यापर्यंत असंख्य प्रसिद्ध लेखकांची पुस्तके आहेत.
विविध कारणांनी पुस्तकांवर बंदी घालण्यात येते. बहुतांश पुस्तकांच्या बाबतीत बंदी घालण्याचे कारण राजकीय-धार्मिक किंवा लैंगिकतेबाबत आक्षेपार्ह मजकूर हे तर काहींच्या बाबतीत आत्यंतिक हिंसक भाषा हेही आहे.
तरीही ज्ञानावर, विचारांवर, विचार मांडण्याच्या मूलभूत स्वातंत्र्यावर कोणाचेही बंधन आणि सेन्सॉरशिप असता कामा नये असा विचार ही वेबसाईट बनवणाऱ्या मंडळींनी मांडला आहे. “साहित्यातील सेन्सॉरशिपला आव्हान देणे” हेच यांचे ब्रीदवाक्य आहे. साहित्यातील स्वातंत्र्यासाठी तयार झालेली वेबसाईट,
नक्की पहा- http://www.banned-books.org.uk/


 
 तन्मय कानिटकर

Monday 17 December 2012

आपलं घर...

आपल्या घराच्या, म्हणजे आपल्या पृथ्वीच्या ४.५ अब्ज वर्षांच्या इतिहासात मानवाचे आयुष्य केवळ २ लाख वर्षांचे वर्षांचे. त्यातही प्रगत मानवाचे आयुष्य ५० हजार वर्षांहून अधिक नाही. तरीही मानवजातीनेयाच्या इतिहासात हा पृथ्वीवर काही अमुलाग्र आणि अपरिवर्तनीय बदल घडवले.पृथ्वीच्या वातावरणामधले बदल सध्या कितीही बलाढ्य अर्थव्यवस्था असलेला देश असला तरी त्याला मुळापासून हलवून सोडत आहेत.


मानवी कारणांमुळे होणारे वातावरणातले बदल, त्याने एकूणच जीवसृष्टीवर होणारे घातक परिणाम याबद्दल आपण सततच ऐकत आलो आहोत. साधारण याच संकल्पानेवर आधारलेला माहितीपट असला तरी “होम” या सगळ्यांपेक्षा अनेक अर्थांनी वेगळा आहे.त्यातला सर्वात महत्वाचा फरक म्हणजे हा संपूर्ण माहितीपट एरिअल चित्रीकरणातून साकारला गेला आहे. एकूण ५४ देशांमधून १२० जागांवर हे चित्रीकरण जवळजवळ वर्षभर सुरु होते. दुसरा आणि महत्वाचा फरक म्हणजे या हा माहितीपट सगळीकडे विनामुल्य दाखवला गेला.हा माहितीपट आपल्या पृथ्वीच्या बदलांवर अभ्यासपूर्ण भाष्य करणारा आहे. त्याच बरोबर याच्या चित्रीकरणाच्या पद्धतीमुळे आपण कधीही पाहिली नसतील अशी अवकाशी दृश्यही आपल्याला पाहायला मिळतील.या चित्रपटाद्वारे समाजात काही सकारात्मक बदल घडावा, माणसाने आपल्या राहणीमानाचा पुनर्विचार करावा अशी या दिग्दर्शिकाची आशा आहे
काही शास्त्रज्ञांच्या मते मानवाने पृथीवर केलेल्या बदलांमुळे आपल्या एकमेव घरावर येणारी अरिष्टे टाळायची असतील तर आपल्याकडे जास्तजास्त १० वर्षांचा काळ आहे.म्हणूनच या माहितीपटाचे महत्व अधिक.

नक्की पहा दीड तासाचा हा माहितीपट- “होम” http://www.youtube.com/watch?gl=NG&list=PL0F367C6043EA950B&feature=plcp&hl=en-GB&v=jqxENMKaeCU



प्रज्ञा शिदोरे

(दि. १४ डिसेंबर २०१२ रोजी दै लोकमत मध्ये प्रसिद्ध- http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=OxygenEdition-57-1-14-12-2012-c9a5b&ndate=2012-12-14&editionname=oxygen